Thursday, 19 May 2016

अहिराणी 
जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.
कोंकणी 
कोकणी या नावाने ओळखल्या जाणार्‍या दहाहून अधिक बोली आहेत. आगरी, चित्पावनी, ठाणा जिल्ह्यातली वारली, रत्‍नागिरी जिल्ह्यातली कुडाळी, सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती काणकोणची कोकणी, तिथल्याच शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवारी या सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे. 
कोल्हापुरी 
कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो.
चंदगडी 
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
झाडीबोली 
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
डांगी, तंजावर मराठी, तावडी
जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
देहवाली 
भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे.. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
नंदभाषा 
व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आजही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेचा वापर करून शंकराची स्तुती करणार्‍या काव्यरचनाही केल्या आहेत.
नागपुरी 
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
नारायणपेठी बोली
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
बेळगावी
बेळगाव या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
भटक्‍या विमुक्त
जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
मराठवाडी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यंतत ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचाचा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
माणदेशी, मॉरिशसची मराठी, मालवणी 
दक्षिण रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
वर्‍हाडी -
बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.

No comments:

Post a Comment